मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून चालढकल : अजित पवार

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून चालढकल : अजित पवार

अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा

मुंबई : गेली चार वर्षे या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या खेळवत ठेवल्या आहेत. गेले १२ दिवस मराठा समाजाचे तरुण आझाद मैदानात उपोषण करत आहेत पण सरकारने याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणूनच हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आम्ही या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका घेणार आहोत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बोलताना जाहीर केली.

मराठा समाजाचे तरूण गेले १२ दिवस मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आज अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. एक तास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार विद्याताई चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव उपस्थित होते.

मराठा समाजाने यावर्षी काळी दिवाळी साजरी केली. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजावर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आझाद मैदानात सुरु असलेल्या राज्यातील उच्च माध्यमिक प्राध्यापकांच्या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी अजितदादा आणि धनंजय मुंडे यांना उपोषणकर्त्यांनी निवेदन दिले.शिवाय त्यांनी आत्ताच्या सरकारने कशी गळचेपी सुरु केली आहे याची सविस्तर माहितीही कथन केली. त्यावेळी अजित पवार यांनी लागलीच ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांना फोन लावला आणि यांचे प्रश्न आणि मागण्यासंदर्भात विचार करावा असे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लगेच कार्यवाही करतो असे आश्वासन दिले. संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावल्याबद्दल उपोषणकर्त्या प्राध्यापकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना धन्यवाद दिले.यावेळी अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्याशी उपोषणकर्त्यांनी सविस्तर चर्चाही केली.

 

Previous articleप्रत्यक्ष गुंतवणुकीत आणि गुंतवणूक प्रस्ताव अंमलात येण्यात सुद्धा महाराष्ट्रच आघाडीवर
Next articleऔरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याची नावे बदला