आदिवासी दुर्गम भागात पोहचणारे राज ठाकरे ठरले पहिले नेते
नाशिक : गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर पेठ हा तालुका आदिवासी दुर्गम भाग असून,आजपर्यंत कोणताच प्रमुख नेता पेठसारख्या दुर्गम भागात गेला नव्हता मात्र पक्ष बांधणीच्या दौ-यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भागाचा दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष बांधणीसाठी नाशिक दौ-यावर आहेत.पेठ तालुका हा तसा नाशिक जिल्ह्यातील अनेक समस्यांनी ग्रासलेला आदिवासी भाग आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या भागात येणार असल्याचे कळताच येथील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने तोबा गर्दी केली होती. आजपर्यंत कोणताच प्रमुख नेता पेठसारख्या दुर्गम भागात गेला नव्हता त्यामुळे संपूर्ण पेठ तालुका राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी व त्यांना ऐकण्यासाठी जमला होता. मग गर्दीचे रूपांतर ज़ाहीर सभेत झाले.
सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे कांदा फेकून मारा असा सल्ला पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पेठ येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. “सरकार दिलासा देत नसेल तर कांदा रस्त्यावर फेकू नका, तो दिसेल त्या मंत्र्याला फेकून मारा हे मी काल सांगताच सरकारने लगेच आज २०० रुपये क्विंटल अनुदान जाहिर केले आहे. पण या सरकारच्या घोषणेवर मी समाधानी नाही” असे खडे बोल यावेळी ठाकरे यांनी सरकारला सुनावले. सभा आटोपून ते सरकारी विश्रामगृहावर पोहचले तिथे त्यांनी होमगार्डच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रश्नाबाबत निवेदन स्विकारले. पेठ तालुक्यातील शेतकरी व मनसेच्या पदाधिकां-यांशी सविस्तर चर्चा करुन या भागातल्या समस्या जाणून घेतल्या. राज ठाकरेंनी दुपारचे जेवण पेठचे मनसे तालुका अध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या आदिवासी पाड्यात असलेल्या घरी केले.