बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था आहे का ? धनंजय मुंडे

बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था आहे का ? धनंजय मुंडे

मुंबई : बीडमधील ऑनर किलिंगची घटना अतिशय गंभीर आहे. पोलिसांना सामान्यांच्या सुरक्षेशी कर्तव्य नाही तर बीड पोलीस या बातमीचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराला अटक करतंय यावरून ते एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहेत असे रोखठोक मत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. सुमित वाघमारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुमितचा दोन महिन्यापूर्वी भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह झाला होता. सुमितशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने त्याची हत्या केली. हे सगळे दिवसाढवळ्या घडले तेव्हा पोलिसांचा धाक पूर्णपणे संपला असून कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेत हे उघड आहे. केवळ जिल्ह्यांतच नाही तर राज्यात मोठे मोठे अपराध होत आहेत मात्र गृहखाते सुस्त आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. सुमितवर हल्ला करणारे तिघेही आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे सोडवून या घटनेची बातमी करायला गेलेल्या पत्रकाराला अटक करणे हे लोकशाहीला घातक आहे. बीड पोलीस एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असतात हे स्पष्ट आहे” असा घणाघाती आरोपही मुंडेंनी यावेळी केला.

Previous articleआदिवासी दुर्गम भागात पोहचणारे राज ठाकरे ठरले पहिले नेते
Next articleसिडकोमार्फत वाटप केलेल्या भाडेपट्टयाच्या जमिनी निर्बंधमुक्त करण्यास मंजुरी