दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची मदत

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली :  केंद्र शासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्रासह देशातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले ६ राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेश यांच्यासाठी एकूण ७ हजार २१४ कोटी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव यांची भेट घेवून राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी राज्याने सादर केलेला मदतनिधी प्रस्ताव लवकर मंजूर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज राज्याला  ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय, कृषीमंत्रालय व निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous articleमहानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात ६ हजार रूपये वाढ
Next articleदुष्काळी मदतीत केंद्राचा महाराष्ट्रातील शेतक-यांवर  अन्याय! : विखे पाटील