नरेंद्र मोदी सरकारचे काम कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे

मुंबई नगरी टीम

मुंबई : काही लोकांचे परिवार म्हणजे पार्टी असते, पण भाजपाची पार्टी म्हणजे परिवार आहे आणि हेच भाजपाचे वेगळेपण आहे, असे सांगत “मेरा परिवार भाजपा परिवार” या उपक्रमाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आज केला.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयावर स्टीकर लावण्यात आले व भाजपाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय व उमा खापरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना पंकजा मुंडे  म्हणाल्या की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना,आयुष्यमान योजना, या सारख्या गरीब कल्याणाच्या विविध योजना जाहीर करून प्रत्यक्ष राबविल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी मोदी सरकारने काम केले आहे. मोदी सरकार केवळ घोषणा करून थांबले नाही, तर प्रत्यक्ष कामही सरकारने केले आहे. हे यशस्वी झालेले काम जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे.

राज्यातील २५ लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटीहून अधिक घरांपर्यंत हा कार्यक्रम पोहचविला जाणार आहे. भाजपाचे कार्यकर्ते गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचून‘मेरा परिवार भाजपा परिवारचे स्टीकर दारावर लावणार असून घरावर भाजपाचा झेंडा लावणार आहेत. त्या व्यतिरिक्त भाजपाचे कार्यकर्ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून व दारावर ‘मेरा परिवार,भाजपा परिवार’चे स्टीकर लावून या अभियानात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उपाध्याय यांनी केले.

बीडच्या खासदार डॅा. प्रितम मुंडे यांनी परळी येथे यशःश्री निवासस्थानी भाजपचा झेंडा फडकावून ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ उपक्रमाचा शुभारंभ केला. जिल्हाभरातील भाजपा पदाधिका-यांनी देखील आपापल्या घरावर भाजपचा झेंडा फडकावला.

Previous articleशिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय
Next articleमुंबईत २३८घरांसह १०७ व्यवसायिक गाळ्यांसाठी लॉटरी निघणार