बीडचे पोलीस आणि जिल्हा प्रशासन भाजपच्या कार्यकर्त्यां सारखे काम करत आहेत

बीडचे पोलीस आणि जिल्हा प्रशासन भाजपच्या कार्यकर्त्यां सारखे काम करत आहे

मुंबई ‌नगरी टीम

बीड  : जिल्हाप्रशासन आणि पोलीस अधिक्षक हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत असा आरोप करीत राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीला सभेची परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले .

बीड येथे पत्रकार परिषदेत मुंडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक आणि प्रशासन दबावात असल्याने निवडणूक निर्भयपणे पार पडेल की नाही अशी शंका उपस्थित केली . यावेळी माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित , युवक नेते संदिप क्षीरसागर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी, समता परिषद जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत आदी उपस्थित होते.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी आम्ही रॅली आणि सभेची परवानगी मागितली ती दिली देखील अन नंतर ऐनवेळी सभेची परवानगी नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले .भाजपच्या लोकांनी दबाव आणल्याने राष्ट्रवादीला मैदान उपलब्ध होऊ दिले नाही,जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा उमेदवारी अर्ज २५ मार्चला भव्य रॅलीसह दाखल करणार आहोत असे निवेदन देऊन त्याबाबत प्रशासनाकडून परवानगी मिळवली होती. मात्र भाजपच्या उमेदवारालाही त्याच वेळी त्याच रस्त्यावरून रॅलीला परवानगी कशी दिली गेली?

एका पक्षाला रॅलीसाठी परवानगी दिली असताना, दुसऱ्या पक्षाला परवानगी देणं हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र तरीही दबावाखाली येऊन परवानगी देण्यात आली. निवडणुकींच्या काळात वारंवार अशी दडपशाही होऊ नये यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांसह, जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असे ते म्हणाले.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रॅलीच्या समारोप सभेसाठी मागण्यात आलेली परवानगी प्रशासनाने नाकारली. माने कॉम्प्लेक्स चौकातील परवानगीही नाकारली. यावरून स्पष्ट होते की पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सत्तापक्षाच्या मस्तीत समरस झाले आहे. हे सत्तापक्षाचे कार्यकर्ते आहेत का असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाची काल परळीत क्रूरपणे हत्या करण्यात आली. ऐन निवडणुकींच्या काळात परळी जिल्ह्यात घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर त्वरीत कारवाई करावी. ही हत्या राजकीय सूडापायी तर नाही याचा छडा लावावा भाजपाच्या एका नगरसेवकाचा हात असल्याचे पुढे येईल असेही ते म्हणाले.

५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी रेल्वेने येईल अशी घोषणा भाजपाच्या वतीने करण्यात आली होती. आज भाजपा उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे ते याच रेल्वेने येणार आहेत का असा मिश्किल सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला

Previous articleरणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा भाजपामध्ये प्रवेश
Next articleडोळ्यांना विकास दिसत नसेल तर तुमच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करून देऊ