मोदी पुन्हा पंतप्रधानपदी आले तर देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात

मोदी पुन्हा पंतप्रधानपदी आले तर देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात प्रचारादरम्यान फिरत असताना लोकांच्या मनातील या सरकारविरोधातील राग आपण स्वत: पाहिला असून मोदी पुन्हा पंतप्रधानपदी आले तर या देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल ही भीती लोकांच्या मनात आहे. त्यामुळे लोकांनी स्वत:च मोदी सरकार हटवण्याचा निश्चय केल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. गेल्यावेळी विरोधकांच्या मत विभागणीमुळे मोदी सत्तेवर आले, मात्र या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एक आल्याने मोदींचा पराभव अटळ असल्याचेही ते म्हणाले.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या धारावी येथील जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. २०१४ च्या निवडणुकीत अवघी ३१ टक्के मते घेऊनही भाजप सत्तेत आला. कारण ६५ टक्के मते मिळालेल्या विरोधकांची मते विभागली गेल्याने हे शक्य झाले. मात्र यंदा ती चुक होणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ते म्हणाले की, आपले पद टीकून रहावे म्हणून मोदींनी आपल्याच पक्षातील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठांना अपमानास्पद वागणूक देत दूर केले. कारण आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ही मंडळी आपल्यापेक्षा वरचढ ठरतील ही भीती मोदींच्या मनात आहे. त्याच पद्धतीने आता आपली सत्ता जाते की काय ही भीती वाटू लागल्याने मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत शहीद जवानांच्या नावावर मते मागायला सुरूवात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोदींनी गेल्या निवडणुकीत दिलेली कोणती आश्वासने पुर्ण केली, असा सवाल करत चव्हाण पुढे म्हणाले की, या सरकारने अच्छे दिनाच्या नावावर मुंबईकरांना फक्त स्वप्ने दाखवली, मात्र मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती आणि धमक फक्त काँग्रेसमध्येच आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपण धारावी पुनर्विकासाला सुरूवात केली होती. सेक्टर पाचमध्ये एका इमारतीचे कामही पुर्ण झाले होते. दुर्दैवाने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारने हा सगळा प्रकल्पच ठप्प केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यातील हे निष्क्रिय सरकार घालवण्यासाठी एकनाथ गायकवाडांना मत देण्याचे आवाहन त्यांनी धारावीकरांना केले.

या सभेला संबोधित करताना एकनाथ गायकवाड यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली. २०१४ साली जे लोक विकासाची भाषा करत होते. ते आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर जनतेत भीती पसरवून सत्तेवर येऊ पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मात्र आता जनता असल्या प्रचाराला बळी पडणार नसल्याचेही ते म्हणाले. धारावीने आपल्याला कायमच बळ दिले असून संविधानात अपेक्षित असलेला बंधुभाव आपल्याला धारावीत पहायला मिळतो, असे सांगत आपले आशिर्वाद असेच पाठिशी असूद्या अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Previous articleपराभवाच्या भीतीनेच विरोधकांकडून जातीचे राजकारण
Next articleयंदाची निवडणुक फक्त विकासाच्या मुद्द्याची नसून राष्ट्रीय अस्मितेची आहे