एकनाथ गायकवाडांनी केला संपुर्ण मतदारसंघाचा दौरा

एकनाथ गायकवाडांनी केला संपुर्ण मतदारसंघाचा दौरा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मोदींच्या जुमलेबाज सरकारची गेल्या पाच वर्षांची निष्क्रियता संपवण्यासाठी  २९ एप्रिल रोजी प्रत्येक मुंबईकराने आवर्जून मतदान करण्याचे आवाहन दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केले आहे. मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस नसून तो पुढील पाच वर्षांसाठी आपले भवितव्य निश्चित करण्याचा दिवस असल्याने प्रत्येकाने आवर्जून मतदान करावे, असेही त्यांनी सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रोड शोच्या माध्यमातून काँग्रेसने धारावी ते अणुशक्तीनगर  संपुर्ण मतदारसंघाचा धावता दौरा पुर्ण केला आहे.

प्रचाराचा  शेवटचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी काँग्रेसने संपुर्ण मतदारसंघाचा एक धावता दौरा पूर्ण  केला आहे. सकाळी दहा वाजता धारावीच्या पंपिंग स्टेशन येथून या रोड शोला सुरूवात करण्यात आली. तिथून सायन बांद्रा लिंक रोड, ओएनजीसी, माहिम सायन लिंक रोड, फिशरमेन कॉलनी, सेनापती बापट मार्ग, माहिम चर्च, सेना भवन, प्लाझा सिनेमा, हनुमान मंदीर, सयानी रोड, रविंद्र नाट्यमंदिर, एल्फिन्स्टन ब्रीज, भोईवाडा नाका, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर टीटी, माटुंगा रेल्वे स्टेशन किंग्ज सर्कल मार्गे ही रॅली झाली. त्यानंतर वडाळा पश्चिमेकडील डॉन बॉस्को शेल्टर परिसरात दुपारचे भोजन आटोपून वडाळा ब्रीज, बरकत अली नाका, दोस्ती एकर्स, प्रतिक्षा नगर, आणिक डेपो, प्रियदर्शनी सर्कल, उमरशी बाप्पा चौक, पी.एल.लोखंडे मार्ग, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे, आचार्य महाविद्यालय, चेंबूर रेल्वे स्थानक, आंबेडकर उद्यान, डायमंड गार्डन, झामा चौक, गोल्फ क्लब, पांजरपोळ या मार्गाने मानखुर्द रेल्वे स्टेशन, अणुशक्तीनगर येथे या रोड शोचा समारोप सायंकाळी चारच्या सुमारास झाला.

सकाळी दहा वाजता या रोज शोला सुरूवात होताना एकनाथ गायकवाड यांनी मतदारसंघातील मतदारांना सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदानासाठी दिलेला वेळ हा आपल्या भविष्यासाठी महत्वाचा असून मतदान केल्यानंतरच सुट्टी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Previous articleराष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘फिर एक बार मोदी सरकार
Next articleराहुल शेवाळे यांचा विजय निश्चित: आदित्य ठाकरे