ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही

ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

ईव्हीएम अत्यंत सुरक्षित असल्याचा विश्वास बाळगण्याविषयी आवाहन करताना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी म्हणाले, इव्हीएम चुकीचे मत नोंदवू शकत नाही यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांची माहिती करुन घेणे नागरिकांचे  कर्तव्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक-२०१९ दरम्यान देशातील ६१.३ कोटी मतदारांनी १० लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवरुन ईव्हीएमच्या सहाय्याने मतदान केले आणि व्हीव्हीपॅटवर त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री केली.प्रत्येक ईव्हीएम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासली आणि सीलबंद केली जाते. तसेच त्यांचे प्रतिनिधी मशीनच्या सीलवर स्वाक्षरी करतात.  ईव्हीएम यंत्रे सर्व मतदारसंघ आणि मतदान केंद्रांना सरमिसळ करुन वाटप करण्यात येत असल्यामुळे कोणती मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रात पाठविली जाणार याविषयी पूर्वकल्पना नसते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्यादिवशी निश्चित होते. तोपर्यंत उमेदवाराला ईव्हीएमवरील कोणत्या क्रमांकाचे बटन दिले जाईल याचाही अंदाज बांधता येत नाही.

मतदान केंद्रावर वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्सचा अनुक्रमांक हा प्रत्येक उमेदवाराला दिला जातो. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधी, अभिरुप  मतदान घेण्यात  येते. ज्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी स्वत: मत नोंदवतात व ईव्हीएमवर निकाल पाहून १०० टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करतात. त्यांच्या प्रमाणिकरणानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरू होते. २०१९ च्या निवडणुकीत एक कोटींपेक्षा अधिक मतदान प्रतिनिधींनी मशीन्सना प्रमाणित केले आहे.मतदानानंतर सर्व मतदान प्रतिनिधी मशीनवर शिक्का लावतात व स्वाक्षरी करतात. तसेच मतमोजणी करण्यापूर्वी मशीनचा अनुक्रमांक तंतोतंत जुळतो की नाही याची पडताळणी करतात. व्हीव्हीपॅटमध्ये चुकीची फक्त १७ मते नोंद झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु त्या १७ मतदारांनी पुन्हा मतदान केल्यानंतर त्यांचा दावा चुकीचा आढळून आला.

२० हजार ६८७ व्हीव्हीपॅटमधील मतांची संबंधित ईव्हीएममधील मतांशी तुलना केली असता फक्त ८ व्हीव्हीपॅटमधील एकूण मतांची जुळणी झाली नाही. तसेच सुमारे १.२५ कोटी मतांच्या गणनेत केवळ ५१ मते  जुळली गेली नाहीत आणि ही गफलत मानवी चुकांमुळे झाली असून मशीनमध्ये काही दोष आढळला नाही. ईव्हीएम मशीनचा प्रशासकीय आणि सुरक्षेविषयी अत्यंत बळकट प्रोटोकॉल असून त्याचा कोणीही भंग करु शकत नाही.आपण लोकसभा मतदानाच्या वेळी नोंदविलेल्या मताची खात्री व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीद्वारे केली आहेच. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleयुवक काँग्रेसचा ‘वेकअप महाराष्ट्र’चा नारा
Next articleभूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार न देणा-या उद्योगांवर कारवाई करणार