दुष्काळग्रस्त मराठवाड्याची सरकारने फसवणूक केली

दुष्काळग्रस्त मराठवाड्याची सरकारने फसवणूक केली

मुंबई नगरी टीम

भोकरदन : अर्धे राज्य पूर परिस्थितीमुळे तर मराठवाडा  दुष्काळामुळे संकटात सापडला आहे.  मात्र जनतेची मदत करण्याची दानत या सरकारमध्ये दिसली नाही. या सरकारला जमतं ते फक्त फसवेगिरी. ऑगस्ट महिना उलटूनही आज मराठवाड्यात पाऊस नाही. सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा शब्द दिला. ढग आले तर पण सरकारची पाऊस पाडणारी विमाने आलीच नाहीत, सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा आज पैठण येथून झाल्यानंतर बदनापूर व भोकरदन येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, कदिरजी मौलाना, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक बांधू असे आश्वासन देत, पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजनही केले. मात्र अजून स्मारकाचा पत्ता नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य स्मारक उभेही राहिले. त्याबाबत आमचे दुमत नाही पण शिवस्मारक अद्याप का झाले नाही? का सवाल केला.

भाजपा सरकार नीच राजकारण करत आहेत. मधुकर पिचड यांच्या पत्नीवर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांच्यावर साधी एफआयआर दाखल केली नाही आणि थेट भाजपमध्ये एंट्री दिली. पारदर्शकतेचा बिगुल वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगावे की या असभ्य राजकारणाचे धडे कुठे घेतले? असा मिस्कील सवाल उपस्थित केला.अवघा महाराष्ट्र पाण्यात असताना  महाजन सेल्फी काढत होते. असे हातवारे करत होते की जणू रशियाला निघाले आहेत. सदाभाऊ  खोत सारखा चळवळीतून आलेला माणूस या भाजपच्या नादाला लागून व्हिडीओ करण्यात मग्न झालाय. हे थांबवले पाहिजे. या सरकारला उलथवून टाकूयात आणि शिवस्वराज्य आणूयात असा संकल्प त्यांनी केला.

Previous articleकाँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या पाठीशी
Next articleपूरग्रस्तांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत