भाजपाशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

भाजपाशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार बनवू शकत नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपा महाराष्ट्रची प्रदेश बैठक आज येथे झाली. बैठकीच्या कामकाजाची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यावेळी ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांना एकूण १ कोटी ४२ लाख मतं मिळाली. पक्षाचे निवडून आलेले १०५ आमदार आणि इतर अपक्ष सहयोगी आमदारांसह भाजपचं संख्याबळ ११९ इतके आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशिवाय राज्यात कोणीही सरकार बनवू शकत नाही.राज्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम असून, आगामी काळात ही रचना अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आजच्या बैठकीत यासंबंधीची रुपरेषा निश्चित करुन, सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.असेही पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीत देशातील सूज्ञ जनतेने राहूल गांधींना अद्दल घडवली‌. संपूर्ण देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केले. यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राहुल गांधींना याप्रकरणी माफी मागायला लावली. न्यायालयाने त्यांचा माफीनामा मंजूर केला. राहुल गांधी यांनी देशातल्या जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशातल्या जनतेचीही माफी मागावी, यासाठी भारतीय जनता पक्ष आंदोलन पुकारणार आहे,” असे पाटील म्हणाले.

आगामी पाच वर्षात देशात पायाभूत क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे देशामध्ये व्यवसायाला व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रचंड वेगाने पुढे जाईल. त्याच दिशेने जाण्यासाठी महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे व तसे सरकार नक्की स्थापन करू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी व्यक्त केला.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे ३२५ तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच भाजपाच्या संघटन पर्वात पक्षाची बूथपातळीपासून मजबूत बांधणी करावी, अशा सूचना फडणवीस यांनी उपस्थित प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांना केल्या.

Previous articleराज्यातील नवे सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार
Next articleमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष त्वरीत सुरू करा : आ. उदय सामंत