शपथविधी सोहळ्यासाठी विधानभवनात तयारीला सुरूवात
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळचा विस्तार अखेर येत्या सोमवारी ३० डिसेंबरला होणार आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा होणारा पहिल्या विस्तारात ३६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे.या शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक,पक्षाचे कार्यकर्ते,आमदार तसेच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्याची शक्यता गृहीत धरून हा शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी विधान भवनात सुरु झाली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. नव्या मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ३० डिसेंबरला दुपारी १ वाजता विधानभनावाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या शपथविधी सोहळ्यात एकूण ३६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे.यापूर्वी हा शपथविधी सोहळा राजभवनावर होणार अशी चर्चा होती. मात्र शपथ घेणा-या मंत्र्यांची संख्या आणि त्यांच्या सोबत शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक,पक्षाचे कार्यकर्ते,आमदार तसेच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने राजभवनावर होणारा शपथविधी सोहळा आता विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी विधानभवन परिसरात सुरु झाली आहे.
काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित न झाल्यामुळे २४ डिसेंबरला होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दोनच दिवसापुर्वी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसची यादी तयार नसल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या शपथ घेणा-या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचा शपथविधी सोहळा २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर पार पडला होता.त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती.पण काहीना काही अडचणींमुळे या विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता.महाराष्ट्र विकास आघाडीच्या येत्या ३० डिसेंबरला होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये तिन्ही पक्षांकडून आपापल्या मित्र पक्षांना आणि अपक्षांना या विस्तारात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.शिवसेनेकडून प्रहार संघटनेने बच्चू कडू तर काँग्रेसकडून सपाचे अबू आझमी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून रविंद्र वायकर,उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर, शंभूराज देसाई यांना विस्तारात संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.राष्ट्रवादीकडून अजित पवार, दिलीप वळसे पाटील,नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ,अनिल देशमुख,राजेंद्र शिंगणे,मकरंद पाटील,बाळासाहेब पाटील,सरोज अहिरे आणि डॉ. किरण लहामटे यांना तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण, यांच्यासह विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि प्रणिती शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.