पुढचे दोन आठवडे भेटीगाठी,गर्दी टाळून घरातच थांबा : अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना विरुद्धचा लढा हा राज्य, देशांच्या सीमेपलिकडचा आणि मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्याने या लढाईत एकजूटीने,एकाच दिशेने प्रयत्नांची गरज आहे. वैयक्तिक स्वार्थ, पक्षीय मतभेद तूर्तास बाजूला ठेवून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वजण एकजूटीने प्रयत्न करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील बाधित रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगून यापुढचे दोन आठवडे नागरिकांनी भेटीगाठी,गर्दी टाळून घरातच थांबावे असे आवाहनही  पवार यांनी केले आहे.महाराष्ट्रात काम करणाऱ्या परराज्यातील मजूरांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असे आवाहन करतानाच परराज्यातील मजूरांसाठी राज्यात ठिकठिकाणी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. मजूरांच्या गरजेनुसार आता जिथे ते आहेत त्याठिकाणी प्रशासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात येत आहे.प्रशासनाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था त्यासाठी योगदान देत आहेत.राज्यात शिवभोजन थाळी योजनेची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना उपलब्ध करण्यात येत आहे. त्यातूनही गरीबांचे पोट भरण्यास मदत होणार आहे अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.

Previous articleसूचनांचे पालन करा अन्यथा पुढच्या पिढीला  किंमत मोजावी लागेल :  शरद पवार
Next articleCoronavirus :आज १७  नविन रुग्णांची नोंद;राज्यातील रुग्णांची संख्या २२० वर पोहचली