दिवसभरात ५ हजार परप्रांतीय मजुर त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहचले

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील टाळेबंदीमुळे रोजगार बंद आहेत अशातच हाताला काम आणि जवळ पैसा नसल्यामुळे आपल्या घराची ओढ लागलेले परप्रांतीय मजुर कुटूंबास चालत आपल्या गावी चालले असल्याचे चित्र सध्या महामार्गावर आहे.अशा सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत विविध आगारातील एसटी बसेसद्वारे त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे २५० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत एसटीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले . त्याचबरोबर  परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील  सुमारे ३ हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.अशा प्रकारे आज दिवसभरात सुमारे ८ हजार मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. भर उन्हात पायपीट करणा-या मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले.काही ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. यापुढे देखील टाळेबंदी संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या ‘या’ फोटोचा सोशल मिडीयात धुमाकूळ
Next articleराज्यात २५ हजार कंपन्या सुरू,सहा लाख कामगार रुजू