देशाच्या तुलनेत मुंबईत तिपटीहून अधिक पॉझिटिव्हीटीचा दर

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय कोरोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या आहेत, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात की, १८ मे  रोजीपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातील किती रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले याची आकडेवारी पाहिली तर याची गरज प्रतिपादीत होते. संपूर्ण भारतात या तारखेपर्यंत एकूण चाचण्या २३ लाख २ हजार ७९२ इतक्या झाल्या आणि त्यात ९६ हजार १६९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण चाचण्यांच्या संख्येत पॉझिटिव्ह येण्याची भारताची टक्केवारी ही ४.१७ टक्के इतकी आहे. तीच महाराष्ट्राची १२.४३ टक्के (एकूण चाचण्या : २ लाख ,८२ हजार पॉझिटिव्ह रूग्ण : ३५ हजार ०५८) इतकी आहे. मुंबईत १३.१७ टक्के (एकूण चाचण्या : १ लाख ६२ हजार पॉझिटिव्ह रूग्ण : २१ हजार ३३५) इतकी आहे. याचाच अर्थ झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत तर ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे. (एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात. रूग्णाला सुटी देण्यापूर्वी सलग दोन दिवस त्याची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.) अशी परिस्थिती असताना मुंबईत चाचण्यांची संख्या कमी आहे. १० हजाराची क्षमता असताना केवळ चार हजारांच्या आसपास त्या होत आहेत. हे संकट पूर्णत: ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यास सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अधिक चाचण्या होतात, असा केवळ दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही.

अनेक देशांमध्ये महाराष्ट्रीयन नागरिक अडकून पडले असताना विमान उतरू देण्यास महाराष्ट्र सरकार परवानगी देत नसल्याने त्यांचे मायदेशी परतणे कठीण होऊन बसले आहे. राज्य सरकारने विमानांना परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.आपल्या भारतवासियांना या काळात मायदेशी परत येता यावे आणि आपल्या स्वकियांसोबत त्यांना राहता यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशात अनेक राज्य सरकारे त्यांच्या राज्यात विमान उतरू देण्यास परवानगी देत असल्याने ते परतू शकत आहेत. महाराष्ट्रात मात्र केंद्र सरकार तयार असतानाही केवळ राज्य सरकारच्या परवानगी अभावी हे शक्य होत नाही. यासंदर्भात आपल्याकडे अनेक नागरिकांकडून विनंती प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात केंद्र सरकारशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला. मात्र, मुख्य अडचण ही राज्य सरकारच्या परवानगीची आहे. अखिल अमिराती मराठी इंडियन (आमी परिवार) यांनी कळविल्यानुसार, दुबई, अबुधाबी येथे ६ हजार हून अधिक महाराष्ट्रीयन अडकून आहेत. जर्मनीत १०० हून अधिक महाराष्ट्रातील विद्यार्थी, युक्रेनमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी, तसेच ऑस्ट्रेलिया व इतर देशांतही अनेक महाराष्ट्रातील नागरिक,विद्यार्थी अडकले आहेत. ही परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्रात केली आहे.

Previous articleफडणवीस पवार यांच्या शपथविधीचा प्लॅन कसा ठरला !
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतक-यांना केले हे आवाहन