कंगना राणावतने फोन करून मानले रामदास आठवलेंचे आभार

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे.मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकारवर टीका केली आहे.टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे.कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल असे सांगत उद्या बुधवारी कंगना मुंबईत येणार असून विमानतळ आणि कंगनाच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तिच्या रक्षणासाठी सज्ज राहतील असा इशारा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

आज अभिनेत्री कंगना राणावतने केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दुरध्वनी करून आपल्याला संरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेऊन रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेत कंगना राणावत यांनी आपण लहानपणापासून मुंबईत वास्तव्यास असून मुंबई आणि महाराष्ट्राची मी परम भक्त असल्याचे सांगितले. यावर आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कंगना राणावत यांच्या रक्षणासाठी मुंबई विमानतळ आणि त्यांच्या निवास्थानी ही सज्ज राहतील असे आश्वासन दिले.मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध आम्ही एक शब्दही खपवून घेणार नाही मात्र सरकारवरील टीका मुंबईवरील टीका असल्याचा कांगावा करून कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी देणे लोकशाहीला धरून होणार नाही त्यामुळे उद्या कंगना राणावत मुंबईत येईल तेंव्हा तिचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल असे आठवले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे.त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकारवर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगना राणाव ला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशारा आठवले यांनी आज दिला आहे. कंगना राणावत यांनी मुंबईला आपल्या मातृस्थानी मानत असल्याचा खुलासा केला आहे.त्यामुळे कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्राविरुध्द मत मांडलेले नाही सरकार आणि राज्य कारभारावर टीका करण्याचे विचारस्वातंत्र्य सर्वसामान्यांप्रमाणे कंगनालाही अधिकार आहे असे आठवले यांनी म्हंटले आहे.

Previous articleकिमान संकटात तरी भ्रष्टाचार करू नका; सरकारवर फडणवीसांचा घणाघात
Next articleवास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी