शिवसेना हा एक “कन्फ्यूज्ड” पक्ष आहे : फडणवीसांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

नागपूर : राज्यसभेत कृषी विषय विधेयक मंजूर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.या विधेयकावरून शिवसेनेने सभात्याग केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.या विधेयकावरून शिवसेनेने लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतली.राज्यात शिवसेना आमच्या सोबत सत्तेत असताना तेव्हाही सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या.शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही असा टीका करतानाच शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे असा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले.शेतक-यांबद्दल काँग्रेस आणि या विधेयकांना विरोध करणारे पक्ष केवळ राजकारण करीत आहेत.शेतक-यांची दिशाभूल करीत असल्याचे सांगतानाच गेल्या निवजणूकीच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा याच सा-यांचे आश्वासन देण्यात आले होते. आता केवळ राजकारणासाठी विरोध करीत असल्याचे फडणवीस म्हणाले

काल जी विधेयके राज्यसभेने मंजूर केली,ती ऐतिहासिक आहेत.शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती करणारी असून,एक देश-एक बाजार यामुळे आता शक्य होणार आहे. शेतक-याने आपला माल कुठे विकायचा, याची मुभा त्याला मिळणार आहे.या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. आपण राज्यात जेव्हा असा कायदा केला, तेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती आणि तेथे शेतकरी थेट विक्री करतो आहे, हे पाहिले आहे.या कायद्यांमुळे आता शेतक-यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

कंत्राटी शेतीसंदर्भात २००६ मध्ये महाराष्ट्रात आघाडी सरकारने कायदा केला.त्याचा फायदा महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे आता त्यालाच संसदेत विरोध ही शुद्ध लबाडी आहे अशा शब्दात त्यांनी या विधेयकाला विरोध करणा-या काँग्रेससा सुनावले.नीती आयोगाने शेती सुधारणांसाठी माझ्या अध्यक्षतेत मुख्यमंत्र्यांचा एक टास्क फोर्स गठीत केला होता. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ,कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री हे या टास्कफोर्समध्ये होते.तेव्हा सर्वांनी हीच मागणी केली होती अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.डॉ. स्वामिनाथन आयोगाने अशाच प्रकारच्या शिफारसी केल्या होत्या.हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचे काम केवळ मोदी सरकार करीत आहे.त्यामुळेच जनता आणि शेतकरी हा मोदी सरकारसोबत आहे.कंत्राटी शेतीसंदर्भातील तरतुदींमुळे शेतक-यांच्या जमिनीची मालकी सुरक्षित राहील.अधिक नफा झाला, तर त्यातील वाटा शेतक-याला द्यावा लागेल.हा मुद्दा आमच्यासाठी राजकारणाचा नाही. शेतक-यांचे शोषण थांबविणे, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.यावर गेल्या १० वर्षांपासून सकारात्मक चर्चा झाली आहे. पण, सध्या केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे असेही त्यांनी स्पष्ट करतानाच काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Previous articleखुशखबर : ऑनलाईन पध्दतीने ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु ; येथे नोंदणी करा
Next articleमराठा आरक्षणाला राजकीय लेबल लावू नका : अशोक चव्हाण