राऊतसाहेब..आपल्याला बोलण्याचे लायसन्स मातोश्रीवरुन की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले ?

मुंबई नगरी टीम

सांगली : शिवसेना खासदर संजय राऊत यांनी सामनाच्या एका अग्रलेखात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकुचंद असा केला होता. यावरून आता पडळकर यांनी देखील आपल्या शैलीत संजय राऊत यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊत यांना शरद पवार यांचा पंटर, खबऱ्या, चमचा म्हणून डिवचले आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर केले आहे. “सामना मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत. त्यासाठी हा पत्र प्रपंच”, असे त्यांनी म्हटले. हिवाळी अधिवेशनादरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या मागण्यांसाठी सभागृहाबाहेर ढोल वाजवून आंदोलन केले होते. त्यावरून संजय राऊतांनी टीका केली होती.

काय म्हटले आहे नेमके पत्रात?

“खरेतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे.आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले की,महाराष्ट्रात हुकूमशाही आणि आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण, फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करुन ढोल वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण न भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश होता. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळे लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार”

“राज्याच्या प्रतिष्ठेवर दारुची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारुची दुकाने उघडून मंदिर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचे अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचे प्रदर्शन मांडायचे हे कसले स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत आपले राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणा-नारळाने ओटी भरुन यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का ते ही महाविकास आघाडीत जाऊन विसरले?.

संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती ? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या. शरद पवार यांच्याविषयी मी मध्यंतरी काही विधाने केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असे राहून राहून वाटते”.

Previous articleफडणवीसांचे सरकार असताना करण जोहरच्या पार्टीची चौकशी का केली नाही ?
Next articleराणेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर प्रहार ; वाचा काय म्हणाले !