मुंबई नगरी टीम
मुंबई : मेट्रो कारशेड प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड बांधण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे.त्याला भाजप नेत्यांकडून याला विरोध केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.असे असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आवाहनाचे स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदींची भेट घ्या आणि तोडगा काढा.’टीम इंडिया’ म्हणून काम करा आताही वेळ गेलेली नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडवरही भाष्य केले होते. यावेळी त्यांनी चर्चा करून मार्ग काढू, असे आवाहन विरोधकांना केले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते. पण, मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता”, असे ते चंद्रकांत पाटील म्हणाले.
“पण, आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे.ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे”, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, हा मुद्दा महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा बनला असून यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे.यासाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.