नवी मुंबईत सत्ता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ : सुप्रिया सुळे

मुंबई नगरी टीम

  • नवी मुंबईत पुढचा महापौर महाविकास आघाडीचा
  • पक्ष सोडून गेलेल्यांवर तुफान फटकेबाजी
  • राष्ट्रवादी पक्ष हे कुटुंब म्हणून लक्षात ठेवले

नवी मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना राजकारणात ५५ वर्षे झाली.त्यातली २५ वर्ष सत्तेत गेली तर २५ वर्ष विरोधात गेली. या ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारांना कधी अंतर दिले नाही ही गोष्ट राष्ट्रवादी पक्ष हे कुटुंब म्हणून लक्षात ठेवले आहे. तसे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे, सांगतानाच सत्ता येते आणि जाते.सत्ता ही सेवा करण्यासाठी असते ती पदासाठी नसते ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबई येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले.नवी मुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे सांगतानाच,साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा, पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला.भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स शिवाय राष्ट्रवादीकडून केलेले इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा सुळे यांनी सांगितला.गणेश नाईक पक्षात असताना कसा त्यांचा सन्मान पक्षात होत होता हे सांगताना ब्लॅंकपेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नांवे टाकली जात होती. नाईकसाहेबांच्या घरात अन्न खाल्लं आहे त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच करणार नाही सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवार यांनी रिटायर्ड व्हावं.छान मार्गदर्शन केले होते.मात्र महाराष्ट्राने पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना तसं असे सुळे यांनी स्पष्ट केले.शिवाय नवी मुंबईकरांच्या मनात’ त्या’ घोड्याची फिल्म छान झालीय त्यामुळे ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है म्हणून आपल्याला पिक्चर बघायचा आहे असे आवाहनही सुळे यांनी केले. पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं अशी आठवण सांगतानाच ५२ लोक पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असेही सुळे म्हणाल्या.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं.त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आले.दाल मे काला है इधरसे निकलो.उध्दवजींनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार मध्ये सव्वा वर्षात कुठलीही टिका करु शकले नाही कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रात दिले आहे. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचे सुळे यांनी सांगितले. भाजपच्या आमदाराच्या गुंडा गर्दीचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर बोलताना हा विषय राष्ट्रीय सुरक्षिततेचा आहे. माझ्या देशाचा प्रश्न आहे त्याच्या सुरक्षिततेचा आहे त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या शब्दानुसार पारदर्शकपणे नक्की काय आहे यांचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावं म्हणजे दुध का दुध आणि पानी का पानी झालं पाहिजे असे खुले आव्हान सुळे यांनी दिले. दरम्यान याप्रकरणी एप्रिल मध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधी भाजपला तर कधी गणेश नाईक यांच्या सत्तेला चिमटे काढत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. या कार्यकर्ता मेळाव्यात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले विचार मांडले.या मेळाव्याला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रशांत पाटील, अशोक गावडे आदींसह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअमरावती,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही
Next articleस्थानिक प्रशासनाला लॉकडाऊनची मुभा,उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती