चित्रा ‘वाघ’ ची ‘वाघीण’ का बनली ? माजी आयपीएस अधिका-याने उपस्थित केला प्रश्न

मुंबई नगरी टीम

  • चित्रा वाघना एव्हड आक्रमक व्हायचं कारण काय ?
  • देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खुश करण्यासाठी
  • एकांगी भूमिका घेवून वाघीण बनता येणार नाही

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.विरोधी पक्ष भाजपने या विरोधात राज्यभर आंदोलन करीत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.तर दुसरीकडे भाजपच्या उपाध्यक्षा यांनी हे प्रकरण लावून धरत सरकारवर हल्लाबोल केला असतानाच माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी फेसबुक पोस्ट लिहित चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सुरेश खोपडे यांची फेसबुक पोस्ट काय आहे ?

पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे.दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे.पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या व आरोप वरून वाटते. मी ३५ वर्षे पोलिस दलात नोकरी केली.अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटना स्थळावर तपास केला तर तो खून आहे की अपघात आहे,की आत्महत्या आहे की….. आहे ते आम्ही ९९टक्के ओळखतो. एखाद्या घटनेमध्ये खून असेल तर तो राजकीय दबाव खाली दडपला जातो का? माझे मत असे की मुळीच नाही. कारण पोलिस स्टेशन हे कांहीं एकमेव तपास करण्याची यंत्रणा नव्हे. क्राईम ब्रंच, सी.आय.डी, क्राईम, सीबीआय… तपास घेवू शकतात. त्यात जर आढळले की पो.स्टेशन अधिकाऱ्याने माहिती दडविली तर तो अधिकारी सह आरोपी केला जावू शकतो.हल्ली कोणीही कोणाला वाचवू शकत नाही.त्यामुळे वानवडी पोलिस योग्य तपास करतील अशी खात्री वाटते. या केसमध्ये सत्ताधारी मंत्र्याचे नाव घेतले जाते.अशा केस मध्ये राजकीय दबाव असू शकतो पण त्याच बरोबर पोलिसावर विरोधी पक्ष,मीडिया,सामान्य जनता,सोशल मीडिया,सद्विवेक बुध्दी …याचा दबाव पोलिस यंत्रणेवर असतो.तो भारी ठरतो.तरीही चित्रा वाघ नावाची महिला एवढा आकांड तांडव का करते ? त्यांनी तपास पूर्ण व्हायची वाट पाहायल पाहिजे असे वाटते. पूजा केसचा खरा तपास व्हायला पाहिजे हे मान्य दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे पण तिच्या आई वडिलांचा संशय नाही. ती २१ वर्षाची मुलगी. कस जगायचं याचा पूर्ण अधिकार तिला आहे. राज्य घटना तसा तिला पूर्ण अधिकार देते.मग चित्रा वाघना एव्हड आक्रमक व्हायचं कारण काय ?

एका पूर्ण सेक्युलर विचाराच्या पक्षातून आरएसएस तत्वज्ञानावर आधारित भाजप मध्ये वाघ बाईंनी उडी घेतली.का घेतली हे त्यांना नसेल पण लोकांना माहीत आहे. दास,शूद्र व स्रीचे ताडण केले पाहिजे. अशी विचार धारा असलेल्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्ष्यात चित्राताई सामील झाल्यात. तिथल्या स्रीयाबद्दल चित्राताई किती वेळा पो.स्टेशन मध्ये गेल्या? पूजा नावाच्या सज्ञान महिलेचे खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगत आहात.पक्ष बदलून तुम्ही केलेले बंड हे केवढे मोठे वैचारिक अंधपतन आहे हे ही लक्षात घ्या!वाघ कधीच पिसाळत नाही.वाघीण पिसळते.जेंव्हा तिच्या पिल्लावर हल्ला होतो तेंव्हा ! प्रश्न असा आहे की चित्रा वाघ यांच्या पोटच्या मुलीने पूजा सारखे वर्तन केले असते तर चित्रा वाघ अश्या वागल्या असत्या का ? मुळीच नाही! चित्रा वाघ अश्या का वागतात ? चित्रा ताई,देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खुश करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तर हे जोडपं हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृती वर आधारित संस्कृती आणण्याचा विचार मांडतात.पण तुमच्या वहिनीच्या कृतीतील संस्कृतीत ते दिसत नाही.त्यावर ही बोला! अशी एकांगी भूमिका घेवून वाघीण बनता येणार नाही!

सुरेश खोपडे

Previous articleदहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार; वेळापत्रक जाहीर
Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशन:संजय राठोड,धनंजय मुंडे मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत