मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.राज्यात काल या वर्षातील सर्वांधिक रूग्ण संख्येची नोंद झाली असल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला नियमांचे पालन करण्याची सूचना करतानाच लॉकडाऊनसंदर्भात गंभीर इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी येथिल जे.जे. रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली.यावेळी मंत्री आदित्य ठाकरे,आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.
मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे. मनापासून सांगतो, की लस घेताना कळतसुद्धा नाही एवढ्या छान पद्धतीनं लस दिली जात आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. म्हणून मी जनतेला आवाहन करतो, ज्यांना ज्यांना लस घेण्यासाठी पात्र ठरवलेलं आहे,त्यांनी मनात कोणतेही किंतु-परंतु न आणता लस घ्यावी. pic.twitter.com/WAk1Ie6iqm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
लस घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही.कोरोनावरील धोका वाढतो आहे.कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे.या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी.लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे असे सांगतानाच,अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला.