सचिन वाझेंचा सरकारमधील बोलविता धनी कोण ? त्याचा शोध घेणे गरजेचं

मुंबई नगरी टीम

मुंबई । सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारने आज पोलीस दलात मोठे बदल केले असतानाच, सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी शिवसेनेने केली होती मात्र त्याला मी नकार दिला असे सांगतानाच सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा का घेतले असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करून वाझे यांचा सरकार मधील बोलविता धनी त्याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे.

वाझे प्रकरणामुळे पोलीसांची आणि राज्य सरकारच्या प्रतिमेवर प्रश्न चिन्ह उभे राहिल्याने आज राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले.त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून वाझे यांचा सरकारमधील बोलविता धनी कोण याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी केली.पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते.तसेच मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते,अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत असे सांगून,आमच्या सरकारच्या काळात वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता.पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव आम्ही नाकारला असे फडणवीस यांनी सांगितले.सचिन वाझे हे शिवसेनेत होते आणि काही वेळ त्यांनी प्रवक्ते म्हणून काम पाहिले होते. वाझे यांचे शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत व्यावसायिक संबंध होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असताना सुद्धा त्यांना सेवेत घेण्यात आले.अनेक लहान आरोप असलेले कोणतेही अधिकारी सेवेत परत घेतले गेले नाही.मात्र सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती देण्यात आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले असा आरोपही त्यांनी केला.मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट देत त्याचे प्रमुख सचिन वाझे होते असाही आरोप त्यांनी केला.मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली,तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती.पण, तेथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलिस ठाण्याला फोन करून तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. मनसुख यांची सलग तीन दिवस चौकशी सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा लिहून घेतली.

मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून,या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही.एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे असे सांगून,मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार वाझे यांचा सभागृहात बचाव करीत होती.ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी करीत सचिन वाझेंचा सरकारमधील बोलविता धनी कोण आहे. शोध घेणे गरजेचे आहे अशी मागणी केली.

Previous articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसने केले गंभीर आरोप !
Next articleबापरे ! राज्यात आज २३ हजार १७९ नवीन कोरोनाचे रुग्ण ; ८४ रुग्णांचा मृत्यू