देवेंद्र फडणवीस नागपूरात ठाण मांडून बसल्याने रूग्णसंख्या आटोक्यात : दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत असून.रूग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्येजमिनीवर रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात येत आहे.म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करीत आहोत असे सांगतानाच फडणवीस यांनी नागपूरात ठाण मांडल्यानेच तेथील रूग्ण संख्या अटोक्यात आली असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आज विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदिवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला.त्यावेळी दरेकर बोलत होते.दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल आमदार योगेश सागर यांचे व सेंटरच्या उभारणीत योगदान असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले.

दरेकर पुढे म्हणाले की,“ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रूग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये,जमिनीवर रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करीत आहोत.”नागपूरचे उदाहरण देऊन दरेकर म्हणाले,“नागपूर येथे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच,देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली.” नागपूरात अशी परिस्थिती असताना नागपूरबरोबरच ते मुंबईतही वेळ देतात.यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत फडणवीस यांचे आभार मानले.“महाराष्ट्रात व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना आपल्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहात, अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूयात!” असा विश्वासही दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी व्यक्त केला.

Previous articleगुजरात,राजस्थान,उत्तरप्रदेशपेक्षा महाराष्ट्र लसीकरणात अग्रेसर
Next articleराज्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवणार,मंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत