लॅाकडाऊन: राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही.ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे.कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.”ब्रेक दि चेन” मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे.या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत.राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या श्रेणीनुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल.यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकाने किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिल्याने याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर याबाबत वरील खुलासा करण्यात आला आहे.

Previous articleमाजी आमदाराची घरवापसी, धुळे जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Next articleअखेर अनलॉकचे आदेश जारी; वाचा सोमवारपासून काय बंद,काय सुरू राहणार ?