शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदीच मदतीला धावून आले ; मोदींचे निर्णय देशाला दिलासा देणारे

संग्रहित छायाचित्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संकटात धावून आले असून, देशातील सर्वाना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या त्यांच्या घोषणा देशाला दिलासा देणाऱ्या आहेत, मोदींना महाराष्ट्राच्यावतीने धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया मोदींच्या घोषणेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

दरम्यान आज मोदींनी देशवासियांना संबोधित केले.लसीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती,राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वादही निर्माण झाला होता. सुरुवातीला लसिकरणाचा निर्णय घोषित करताना केंद्र सरकारने ४५ व त्यावरील नागरीक, फ्रंटलाईन वर्कर आणि व्याधीग्रस्त नागरिकाच्या मोफत लसीकरणाची घोषणा केली होती व त्यानुसार देशात आतापर्यंत सुमारे २३ कोटी नागरिकांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. मधल्या काळात महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी लसीकरणाची परवानगी द्यावी,अशी विनंती केंद्र सरकारला केली होती. महाराष्ट्राने तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणाही केली होती.परंतु, राज्य सरकारे लसी उपलब्ध करून घेण्यात अयशस्वी ठरल्यामुळे लसीकरणाबाबत मोठा गोंधळ देशात निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची घोषणा जनतेला दिलासा देणारी आणि केंद्र-राज्य वादावर पडता टाकणारी ठरणार आहे. आज नरेंद्र मोदी यांनी प्रमुख दोन घोषणा केल्या. देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिली जाईल आणि, दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वितरित केले जाईल.
आपली प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या निर्णयांचं मी मनापासून स्वागत करतो.केंद्राने मोफत लसीकरण करावे, १८ ते ४५ वयोगटासाठी लसी द्याव्या ही मागणी सातत्याने केली जात असताना आज पंतप्रधानांनी देशवासीयांसाठी,देशातील गरीब लोकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घोषित केला आहे.यामुळे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा लसीकरणाचा प्रश्न निकाली निघणार आहे. याबरोबरच गरिबांची काळजी करणारे पंतप्रधान आहेत,हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे.८० कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेतून मोफत अन्नधान्य,जे यापूर्वीही लॉकडाऊनच्या काळात मिळत होत, त्याचा विस्तार करून ते दिवाळीपर्यंत दिलं जाणार आहे. अत्यंत स्वागतार्ह असे निर्णय पंतप्रधानांनी घेतले आहेत. लसीची चिंता करायचे कारण नाही. परंतु, केंद्र सरकारला दूषणं देणाऱ्यांना सांगायचे आहे की,शेवटी केंद्रच आपल्या मदतीला धावून आले आहे.आता एकमेकांशी समन्वय साधत आपण संकटातून बाहेर येऊ.उणीदुणी काढण्यापेक्षा पंतप्रधानांसोबत, केंद्रासोबत समन्वय साधून या संकटाला दूर करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ. महाराष्ट्राच्या वतीने,महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.

Previous articleमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
Next article‘देर आये दुरुस्त आये’; पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा टोला