मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना मिळाला रोजगार; तुम्ही नोंदणी केली का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात मे २०२१ मध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या,कॉर्पोरेट संस्था,उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ०५५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे,असे मंत्री मलिक यांनी सांगितले. मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या,उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ९३८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे.यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात.त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले की,मे महिन्यात मध्ये विभागाकडे २१ हजार ७१० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ४३०, नाशिक विभागात ४ हजार ९५७, पुणे विभागात ५ हजार ५०८, औरंगाबाद विभागात ३ हजार १४८, अमरावती विभागात १ हजार २५६ तर नागपूर विभागात १ हजार ४११ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहे मेमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १० हजार ८८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ६१६, नाशिक विभागात २ हजार ७९४, पुणे विभागात ३ हजार ४४९, औरंगाबाद विभागात ८८१, अमरावती विभागात १०६ तर नागपूर विभागात ४० इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Previous articleमोदी- ठाकरे भेटीवर काय म्हणाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
Next articleनवनीत राणांची खासदारकी धोक्यात ! अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पहा-चाकणकरांचा टोला