मुंडे भगिनींच्या नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडेंनी सोडले मौन !

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने खासदार प्रितम मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.त्यांनतर आज प्रथमच पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मी आणि प्रीतम मुंडे नाराज नसल्याचे स्पष्ट केले.मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असे मला वाटत नाही.मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असे त्यांनी सांगून,चर्चांना पूर्णविराम दिला.केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.त्या म्हणाल्या की,केंद्रीय मंत्रीपदासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढले होते.त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही.महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतेही पद द्यायचे असेल तर मुंडे कुटुंबाचे नाव चालते. त्यामुळे आमचे नाव चालले. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही.कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात.सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत.केवळ प्रीतम यांचेच नाही तर हिना गावित यांचे नावही चर्चेत होते. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असे सांगतानाच प्रितम मुंडेंचे नाव चर्चेत होते आणि योग्य होते. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नव्याने समावेश केलेल्या मंत्र्यांचे अभिनंदन का केले नाही याचेही कारण सांगितले. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हते. त्यामुळे मी कुणाचेही अभिनंदन केले नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचेही अभिनंदन करते, असे त्या म्हणाल्या.मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली.त्यांचे अभिनंदन केले. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचे आणि दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितलं होते, असंही त्यांनी सांगितले.

वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठिशी मी उभा राहणार आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. पायाला फोड आलेले असतांनाही पट्टया बांधून प्रचार केला हे विसरून चालणार नाही असे सांगतांना मुंडे साहेबांच्या आठवणीने त्या गहिवरून गेल्या. नेता महाराष्ट्राचा असतो, तो कोणत्या जातीचा नसतो त्यामुळे ओबीसीचा नेता असे म्हणणे बोलणे योग्य नाही असेही त्यांनी एका प्रश्नांवर बोलताना सांगितले.

Previous articleमहागाईचा भडका : रस्त्यावर चुली मांडून काँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध
Next articleमोठा निर्णय : अखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित