आधी चो-या आता बहाणे! प्रवीण दरेकर यांचे नवाब मलिकांना उत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिका-यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चो-या-आता बहाणे असा प्रकार आहे, अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत ? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चो-या नंतर बहाणे अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी ३६ नगरसेवकांपैकी २३ मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

Previous article३ लाख युवक-युवतींना मिळणार बँकींग,फायनान्स सर्व्हिसेस,इन्शुरन्सचे प्रशिक्षण
Next articleमाथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य