स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय भरतीसाठी विशेष मोहिम राबवणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष मोहीम राबवावी तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित निवृत्तीवेतनाबाबत राजस्थान सरकारच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांना शासकीय सेवेत घेण्याबाबत शासनाच्या ४ मार्च १९९१ च्या परिपत्रकानुसार यापूर्वी ज्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ही भरतीप्रक्रिया राबविली त्यानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व पुढील पदोन्नती देण्यात यावी.येत्या दोन महिन्यात सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची अद्यावत माहिती प्राप्त करून घ्यावी.ही माहिती देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही राज्यमंत्री भरणे यांनी दिले.

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी
आगामी काळात शासनाच्या सर्व विभागांमध्ये पदभरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी व परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश भरणे यांनी दिले.परीक्षा देणाऱ्या उमेदवाराची चेहरा ओळख सांगणारे तंत्रज्ञान तसेच जॅमर लावणे यासारख्या उपायांचा समावेश परीक्षा पद्धतीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी पेपर फुटूनये व डमी उमेदवार परीक्षेस बसू नये यादृष्टीने काळजी घ्यावी.परीक्षेत काही गडबड झाल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही राज्यमंत्री भरणे यांनी दिला.

Previous articleपैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार;मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
Next article…अन्यथा सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही : भाजपचा इशारा