राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या फेब्रूवारी मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता असून,राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी,असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

मदान यांनी सांगितले की,राज्यभरातील महानगरपालिका,नगरपरिषदा,नगरपंचायती, जिल्हा परिषदा,पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.

Previous articleआरोग्य विभागातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा
Next articleराज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे,ही असंवेदनशीलता