अर्धे काय पूर्ण मंत्रीमंडळ टाका ना तुरुंगात ! देवेंद्र फडणवीसांना मलिकांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही मलिक यांनी लगावला. दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे.इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली तीच क्रांती भाजपप्रणीत केंद्रसरकारच्या विरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहिल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाल – बाल-पाल या तीन क्रांतीकारकांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपचे हे जुलमी सरकार उलथवायला ही तीन राज्ये कारणीभूत ठरणार आहेत असे स्पष्ट केले. राज्याचे अधिकार जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे केंद्रसरकार यंत्रणेचा वापर करून खोट्या केसेस बनवून बदनाम केले जात आहे. जे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा पीएमओमधून कंट्रोल असतो त्या अधिकार्‍यांवर दबाव आणून सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा हा देशभर सुरू आहे. विशेष करुन पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात असेही मलिक यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दाखवून दिले आहे तर महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे ती दाखवून देईल. तर पंजाबमधूनही क्रांतीला सुरुवात झालीय. जुलमी केंद्रसरकारच्या विरोधात या तीन राज्यात वणवा पेटणार आहे.या परिवर्तनाच्या लढाईत जनता आमच्यासोबत असेल असेही मलिक म्हणाले.

Previous articleशिवसेनेचा काँग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून गृह योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार
Next articleखूशखबर : २२ ऑक्टोबरपासून दुकाने,हॉटेल,बारच्या वेळा वाढवणार