आठवलेंचा निर्धार: मुंबईत १ खासदार,जिल्ह्यात १ आमदार आणि तालुक्यात १ नगरसेवक

मुंबई नगरी टीम

मुंबई । रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत प्रत्येक तालुक्यात किमान १ नगरसेवक,जिल्ह्यात १ आमदार आणि मुंबईच्या लोकसभेच्या ६ जागांपैकी १ खासदार रिपब्लिकन पक्षाचा निवडून आला पाहिजे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात रिपाइंचा मुलुंड तालुका निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात आठवले यांनी कार्यकर्त्याना आवाहन केले.

मुलुंडमध्ये आरपीआयचा नगरसेवक झालाच पाहिजे हाच निश्चय व्यक्त करण्यासाठी मुलुंड तालुक्यातर्फे रिपाइंचा निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता.मनोज कोटक खासदार झाल्याने त्यांचा नगरसेवकपदाचा वॉर्ड रिक्त आहे. ती जागा आरपीआयला मिळावी.तसेच भाजपच्या एका नगरसेवकावर स्थानिक जनता नाराज असल्याने वॉर्ड क्रमांक १११ आरपीआयला मिळावा अशी मागणी यावेळी रिपाइं तर्फे आठवले यांच्याकडे करण्यात आली. स्थानिक झोपडपट्टीवासीयांची मागणी आहे की मुलुंड मध्ये आरपीआयला एक जागा सोडल्यास रिपाइंचा नगरसेवक निश्चित निवडून येईल असे मनोगत रिपाइंच्या मुलुंड मधील कार्यकर्त्यानी एकजुटीने व्यक्त केले.

मुंबईत प्रत्येक जिल्ह्यात १ याप्रमाणे विधानसभेच्या किमान ६ आणि लोकसभेची किमान १ जागा आरपीआयला मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू.मुलुंड मध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे त्यामुळे मुलुंडच्या ६ वॉर्डपैकी १ वॉर्ड आरपीआयला सोडावा यासाठी मित्रपक्ष भाजपकडे शब्द टाकणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. पालिका निवडणुकीत १ जागा मिळावी असा निर्धार करण्यापेक्षा आपला देश मजबूत करण्याचा निश्चय करा असे आवाहन यावेळी आठवले यांनी केले.पालिका निवडणुकीत मित्रपक्षाकडे १ जागा सोडावी अशी मागणी करण्यापेक्षा आपला पक्ष आपला वॉर्ड तालुका जिल्ह्यात मजबुत करा.त्यासाठी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांचा आदर्श घेऊन जनतेसाठी पक्ष वाढीसाठी कष्ट करा असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केले. मित्रपक्षाला समजून घेऊन युतीच्या राजकारणात संयमाची भूमिका घ्यायची असते असा सल्ला रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिला. यावेळी रिपाइं जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड; राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव; विलास तायडे; साहेबराव सुरवाडे दादासाहेब झेंडे; मुस्ताक बाबा अजित रणदिवे अंबर केदारे; संजय अडगावकर; रंजना नायर; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleप्रविण दरेकरांच्या गाडीला चौथ्यांदा अपघात;चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleमी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …!