राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार ? : नाना पटोलेंचा घरचा आहेर

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही.महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे ? असा सवाल काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी विचारला.

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की,दरवर्षी ९ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे ? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार
Next articleकाँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा,शिवसेना हे चोरांचे सरकार; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र