‘मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का’? शरद पवारांनी घेतला राज ठाकरेंच्या प्रश्नांचा समाचार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत,अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला होता.त्यांच्या टीकेला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांनी बालिश पद्धतीने भाषणात उल्लेख केला त्याच्यावर काय उत्तर द्यायचे असे सांगून,त्यांनी अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेला आरोप हा राजकीय नसून पोरकटपणा आहे.मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का ? असा सवालही पवार यांची आज पत्रकार परिषदेत केला.

ठाण्यात काल झालेल्या उत्तर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली.शिवाजी पार्कवर झालेल्या सभेनंतर सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना ईडीच्या नोटीसीनंतर राज ठाकरे एवढे बदलले यांचे आश्चर्य वाटते असा टोला लगावला होता.या टीकेचा समाचार घेताना, एकाच घरात राहून अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते पण सुळेवर ईडीची धाड पडत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.या टीकेलाही पवार यांनी उत्तर देत राज ठाकरे यांचा समाचार घेतला.अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेला आरोप हा राजकीय नसून पोरकटपणा आहे.मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का ? असा टोला पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी माझा नास्तिक असा उल्लेख केला.परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही.मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा,एकच ठिकाण आहे,एकच मंदिर आहे.त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही.माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे.प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली आहे.गैरफायदा घेणा-याला ठोकून काढण्याचे काम केले असून, आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असे नसावे असा टोलाही पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.एखादी व्यक्ती वर्ष -सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला पवार यांनी राज ठाकरे यांना लगवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही,असा उल्लेख त्यांनी सभेत केला.पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका.छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे.त्यासाठी मला लवकर उठावं लागतं. खुपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही असा टोलाही पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते.या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असेही पवार म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल मी बोललो, मी लपवून ठेवत नाही. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता.त्याला माझा सक्त विरोध होता.शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात होता.परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता असं माझं मत तेव्हाही होतं ते आजही कायम आहे असेही पवार म्हणाले. जेम्स लेन यांनी जे काही लिखाण केले त्या लिखाणाचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता,अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे वक्तव्य करत असेल त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नाही म्हणून मी जी टिका टिप्पणी केली असेन तर त्याचे मला दु:ख वाटत नाही उलट मला अभिमान वाटतो अशा शब्दात पुरंदरेंवरील टिकेला पवार यांनी उत्तर दिले.आज खऱ्या अर्थाने महागाई, दरवाढ, बेरोजगारी हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते.ज्यांनी एवढं मोठं काल भाषण केले त्यांनी सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्या प्रश्नाचा साधा उल्लेखही केला नाही यावरही पवार यांनी टिका केली.

सोनिया गांधी आणि माझ्याबद्दल राज ठाकरे यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे जाहीर मत आधीपासूनच स्पष्ट होते.सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होता,तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते.त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत.मात्र त्याकाळात जे काही घडले,त्याचे सविस्तर वाचन केले असते तर कदाचित अशाप्रकारचे उदगार राज ठाकरे यांनी केले नसते.आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे,असे राज ठाकरे म्हणतात ते खरे आहे.संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली व खरे दाखवून दिले की,त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे.त्यांच्या सभा मोठ्या होतात सभेला लोक जातात.त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते असा सणसणीत टोला पवार यांनी लगावला.

राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होतो आहे. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत.लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना पवार यांनी राज्य सरकार याबाबत गंभीरतेने विचार करेल असे स्पष्ट केले. भाजपबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला.महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.विक्रांतसाठी पैसे गोळा केले हे दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला ? माझ्या वाचनात आले की ते पक्षाकडे जमा केले. भावनेला हात घालून पैसे गोळा केले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले. ते पैसे सैन्यदल किंवा नौदलला देता आले असते.हे सर्व आक्षेपार्ह आहे असेही पवार म्हणाले.

Previous articleदोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात;विविध विभागांना भेटी,कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे केली चौकशी
Next articleभाजपाच्या हिंदुत्वाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही;हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे