पद्मावती सिनेमावर बंदी घाला ! अन्यथा वर्षावर मोर्चा
राजपूत समाजाचा इशारा
मुंबई दि.१ दिग्दर्शक संजय लिला बन्साली यांच्या बहुचर्चित पद्मावती चित्रपटाला प्रखर विरोध होत असून, पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या” वर्षा” निवासस्थानावर मोर्चा काढू असा इशारा आज राजपूत महामोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.
पद्मावती या चित्रपटात राजपूतांचा अपमान करण्यात आला असून, या चित्रपटात दिग्दर्शक संजय लिला बन्साली यांनी इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप राजपूत महामोर्चाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करू नका अशी भूमिका राजपूत समाजाने घेतली आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने आज पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून आपली भूमिका मांडली. १५ नोव्हेंबरपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला नाही तर १७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थावर मोर्चा काढू असा इशारा या समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चात राज्यभरातून १ लाख राजपूत सहभागी होतील अशी माहिती महामोर्चाचे प्रमुख अजय सेंगर यांनी यावेळी दिली. उद्यापासून राज्यातील प्रत्येक पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून निवेदन देणार असल्याचे महामोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पद्मावती चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास मांडला जात आहे. त्यामुळे या चित्रपटातील काही भागांना कात्री लावून चालणार नाही तर या चित्रपटावरच बंदी घातली पाहिजे असे मत या संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. जर सिनेमा प्रदर्शित झाला तर राजपूत समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिणार असून, चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणीही केली जाईल असे आश्वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी राजपूत महामोर्चाच्या शिष्ठमंडळाला दिले.