राहुल गांधींवर सूडबुद्धीने कारवाई ; राज्यातील काँग्रेसचे नेते सलग तिस-या दिवशी रस्त्यावर

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत.त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही,केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने राहुल गांधींविरोधात सुरु केलेल्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, महिला व बालकल्यणा मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.राजकीय द्वेषातून भाजपा सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार,महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे. देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. केंद्रातील बहिऱ्या व मुक्या सरकारला अंसतोषाचा हा आवाज पोहचवण्यासठी राजभवनवर धडक मोर्चा काढला असून केंद्र सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा पटोले यांनी दिला.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनियाची व राहुलजी यांना नोटीसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची हा दडपशाही सहन करणारा नाही त्याविरोधात उभा राहिला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष मोदी सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व त्याग केला, बलिदान केले त्या कुटुंबाला अशा प्रकरणे त्रास देणे निंदनीय आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनियाजी व राहुल गांधी पुरून उरतील. आमचे हे नेते मोदी सरकारच्या समोर कदापी झुकणारे नाहीत. आमच्या भावना राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवाव्यात हीच आमची अपेक्षा आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, खोट्या प्रकरणात अडकवून आमच्या नेतृत्वाला दाबण्याचा केला जात आहे. परंतु आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही आमच्या तीव्र भावना या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे. राज्यपालांनी आमच्या या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवाव्या. हँगिक गार्डनपासून निघालेला मोर्चा पोलिसांनी राजभवन जवळ अडवला व नंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

काँग्रेसच्या विनंतीनुसारच राज्यपालांसोबतची भेट रद्द

काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले,एच के पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला आज राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती.परंतु आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली.राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबई येथे असून शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात काही नेत्यांनी राज्यपाल मुंबईत उपलब्ध नसल्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleराज्यसभा निवडणुकीत जसा राजकीय भूकंप झाला तसाच विधान परिषदेच्या निवडणुकीत होणार
Next articleदहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; निकाल ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार