राज्यात उपमुख्यमंत्री हेच खरे मुख्यमंत्री : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई नगरी टीम

अलिबाग । राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत अशा शब्दात युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.तुम्ही घाबरू नका,ही लढाई तुमच्याविरोधात नाही असे स्पष्ट बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या आज बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग मतदार संघात पार पडला.या यात्रेला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या आज अलिबाग येथे पार पडला.यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी संवाद साधला.यावेळी सुरूवातीलाच तुम्ही घाबरू नका,ही लढाई तुमच्याविरोधात नाही असे स्पष्ट करत बंडखोर आमदारांवर बरसले. आज पावसात चालताना वेग वाढला.याच मातीतील आपण लोकं आहोत.या गद्दारीत रायगडला काय मिळाले ? असा सवालही त्यांनी यावेली केला. मी पहिला आमदार आहे की राजकारणात जे काही पहायचे होते ते पाहिले. करोनाचा काळ पाहिला. मंत्रीमंडळाचा पहिला निर्णय या रायगडसाठी ६०० कोटी दिले.आज गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो.ते चेहरे लपवून चालत होते.त्यावेळी गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील टीकेचे बाण सोडले.राज्यात उपमुख्यमंत्री हेच खरे मुख्यमंत्री आहेत.मंत्रीमंडळ जाहीर व्हायला ४१ दिवस लागले असे सांगून या मंत्रीमंडळात रायगडचे कोणी नाही, मु़बईचे कोणी नाही, महिलांना स्थान नाही, अशी सडकून टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना झेंडे खाली घेऊ नका असे आवाहन केले. मी दिसलो नाही तरी चालेल पण झेंडा डोलात फडकला पाहिजे.हे गद्दारांचे सरकार आहे कोसळणार म्हणजे कोसळणार असेही ते यावेळी म्हणाले.बंडखोरांना मंत्रिमंडळात दुय्यम खाती मिळाली असल्याने त्यांच्या तोंडावर पश्चाताप दिसत आहे. यांना गरजेपेक्षा आणि लायकी पेक्षा जास्त दिले. यांना डोळेबंद करून मिठी मारली; यांनी पाठित खंजीर खुपसला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. उठाव करायला ताकद लागते,यांनी पळून जाऊन गद्दारी केली.हे खरे शिवसैनक असते तर डोंगर हॅाटेल बघितले नसते तर त्याचवेळी आसामच्या पुरात मदतीला उतरले असते.खायला तिकडे अन्न नव्हते,मदत हवी होती. शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते,अशी टीकाही त्यांनी केली.दु:ख सरकारमधून बाहेर पडल्याचे नाही तर दु:ख याचे आहे यांना सर्वोतपरी मदत केली, त्यांना उमेदवारी दिली त्यांचायसाठी फिरलो सभा घेतल्या आणि यांनीच गद्दारी केली,अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.ठाकरे सरकार पडत असताना हे टेबलावर नाचत होते.हे तुमचे आमदार होतील, हे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला.काय यांची वृत्ती आहे हे ओळखा. आज जे घसा फोडून सांगत आहेत बाळासाहेब यांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत.जरा तरी शिवसैनिक असते तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आज ही एकच म्हणणं आहे तुमच्यावर दडपण असेल कोणी काही बोलणार नाही.जर तुम्हाला तेथे आनंदात रहायचं असेल लाज उरली असेल तर राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा होऊन जाऊदे; जनता कुणाला कौल देईल तो मला मान्य आहे.अजून ही काहींना वाटत असेल आपण चुकलो त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.महाविकास आघाडी झाली तेव्हाही आपण आपली भूमिका बदलेली नाही. तिरूपती देवस्थानाला आपण महाराष्ट्रात जागा दिली.१० पुरातन मंदीरांसाठी,गड किल्यांसाठी फंड दिला.आपले हिदुत्व सर्वांना पुढे घेऊन जाणारे हिदुत्व आहे. आपले सरकार विकास करत होते. हे करताना कुठलाही जातीपातीचा वाद झाला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.हे लोकं महाराष्ट्राचे पाच तुकडे करतील.दंगली करतील,यांना महाराष्ट्र मागे खेचायचा आहे.मला तुमच्याकडून काही नको फक्त प्रेम आणि आशिर्वाद हवेत.ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही महाराष्ट्रासोबत आणि माणुसकीसोबत केली.गद्दारीही केव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे हे रुग्णालयात होते.मी भारताबाहेरचा दौरा रद्द करणार होतो पण उद्धव ठाकरेंनी मला जायला सांगितले. पहिले ऑपरेशन नीट झाले पण दुसरे हे क्रिटिकल होते. त्यांना चालायला येत नव्हते हालचाल होत नव्हती.याचवेळी हे गद्दार मुख्यमंत्री बनायची स्वप्न बघत होते;शिवसेना फोडण्याचा कट रचत होते. या गद्दारांना सर्व दिले चांगली खाती दिली तरीही गद्दारी केली. ही गद्दारी तरुणांना संदेश आहे की चांगल्या लोकांना या राजकारणात संधी नाही हे दाखवण्यासाठी आहे. शिवसेनेला फोडा मराठी हिंदुमध्ये फूट पाडा ठाकरेंना एकटे पाडा हिच यांची इच्छा आहे, जे तुम्ही होऊ देणार नाही याची खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleसत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ? ….अजितदादा भडकले !
Next articleमहाराष्ट्राशी गद्दारी,सत्तेत आली शिंदेची स्वारी : विरोधकांची जोरदार घोषणाबाजी