महापुरुष आदर्शच त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये : पंकजा मुंडेंनी टोचले कान

मुंबई नगरी टीम

परळी वैजनाथ । लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आपल्या सर्वांवर चांगले संस्कार आहेत. आपल्या एकजुटीच्या शक्तीतूनच कोणत्याही प्रसंगाला आपण खंबीरपणे सामोरे जातो. आपल्या कार्यक्रमांचे नेहमी विराट शक्तिप्रदर्शन, घोषणा,टाळ्या शिट्ट्या असे चित्र असते तथापि आपल्या एकजुटीची ताकद किती संयमी आहे याचा अनोखा प्रघात आजच्या आपल्या अर्ध्या तासाच्या मौनाने जगासमोर सिद्ध करून दाखवला आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सत्य स्वाभिमान व वंचितांच्या सेवेचा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही अशी ग्वाही आज गोपीनाथ गडावरून दिली.महापुरुष हे आपल्यासाठी आदर्शच आहेत,त्यांच्याबद्दल वाईट,चुकीचे बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावर अनोख्या पद्धतीने एकजूट दिसून आली. गोपीनाथ गड आपापल्या गावी घेऊन जावा व राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचे मौन पाळावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते, त्याला राज्यात सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला.कार्यकर्ते व नागरिकांनी आपापल्या गावी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत अर्ध्या तासाचे मौन पाळले.प्रारंभी सकाळी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे,त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे,गौरव खाडे तसेच कुटूंबातील सदस्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल पंकजा मुंडे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह अर्धा तास मौन पाळले, त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले.पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे यांची आज जयंती नाही तर वाढदिवस आहे, त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत, हया आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशात अनेक ठिकाणी त्यांची पूजा होते. त्यांचं अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम रहावी असे कामं माझ्या हातून होईल असाच माझा नेहमी प्रयत्न आहे. खोटं बोलून राजकीय स्थान मिळवता येत नाही, कोणतंही संकट बाजूला सारून उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, ते केवळ तुमच्यामुळेच असं त्या म्हणाल्या.

महापुरुषांना जातीवरून वाटू नका. जातीभेद नष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. फुले, राजर्षि शाहू, डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच बोलले जाऊ नये.त्यांना जाती-जातीत विभागण्याचे काम आज होत आहे, हे अतिशय गंभीर व धोकादायक आहे. महापुरुषांची विभागणी जातीवरून करू नका हीच मुंडे साहेबांची शिकवण आहे.जनतेसाठी जो कोणी चांगलं करेल त्याच्या हिताचं चिंतन आपण करतो. पुुरोगामी महाराष्ट्राचे वेगळे चित्र उभे राहायला हवे आहे.जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे इथलं राजकारण- समाजकारण गेलं पाहिजे. सामान्य माणसाला आवाज असावा. कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये. सोशल मीडिया वापरून कोणी नेता बनू शकत नाही. त्यासाठी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करावे लागते. जोपर्यंत आकाशात सुर्य, चंद्र आहे तोपर्यंत मुंडे यांच्यावर लोकं प्रेम करत राहणार. राजकारण करणारे अंसंख्य आहेत पण समाजकारण जो करेल तो या देशाचे भविष्य असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे याच मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे.महाराष्ट्रात सुद्धा आता समाजाच्या विषयांना हात घालून समाजाचे विषय हाताळले जातील अशी अपेक्षा व विश्वास मी गोपीनाथ गडावरून व्यक्त करते. विकास व उन्नतीचा भाग माझ्या मराठवाडा व विदर्भाच्या मागासलेल्या जनतेच्या पदरात पडो.या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय मिळो. त्यांच्यासाठी काम करणं हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जो चूक नसेल असा व्यक्ती माझ्यासमोर आला तर त्याच्या धोतराला जोड असेल आणि त्याच्या जोड्याला दहा ठिकाणी शिवलं असेल ना तरी त्याच्या जोड्यावर डोकं ठेवेन. पण जर कुणी चुकीचा असेल तो माझ्या मनामध्ये कधीच बरोबर होऊ शकत नाही.त्यामुळे कधी राजकारण करत असताना चुकीची गोष्ट करायला लावू नका मी ती करणारही नाही असे पंकजा मुंडे यांनी नि:क्षून सांगितले. आपोआप जे लोक जवळ आले आहेत तेच खरे आहेत आणि याच विचारांच्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. जेव्हा एखाद्याचं नाव होतं तर सेनापतीचे नाव लक्षात राहते. त्यामुळे तुम्हीच माझे शिल्पकार आहात. हीच ताकद व एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleदोन पावले मागे या..राष्ट्रवादीला एक नंबरवर न्यायचा असेल तर ! अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
Next articleउल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल ?