मुंबई नगरी टीम
पुणे । महाराष्ट्रात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करत आहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. अकोला आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. दोन्ही ठिकाणी पोलिस सतर्क होते. जेथे गरज होती, तेथे अतिरिक्त पोलिस कूमक पाठविली होती. आता संपूर्ण स्थिती शांततापूर्ण आहे. कुणीतरी जाणूनबुजून राज्यातील शांततेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करते आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न होतो आहे. असा प्रयत्न जे करतात, त्यांना अजीबात सोडणार नाही. काही संस्था, व्यक्ती हा प्रयत्न करीत आहेत, योग्यवेळी सर्व काही बाहेर आणणार असेही फडणवीस यांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की,सध्या राज्यात जे चालले आहे, तो कोणत्या लोकशाहीत बसते ? आम्ही विधानसभा अध्यक्षांना चालू देणार नाही, फिरु देणार नाही, घेराव करु, अशी भाषा वापरली जाते आहे. ठाकरे गटाची बाजू कमकुवत आहे, हे त्यांना माहिती असल्यानेच अशी भाषा वापरली जाते आहे. विधानसभा अध्यक्ष हे स्वत: एक निष्णात वकील आहेत. ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. ‘रिझनेबल टाईम’चा अर्थ त्यांना कळतो आणि मला खात्री आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता, ते कायदा-संविधानसंमत निर्णय घेतील.