याची भाजपला किंमत चुकवावी लागेल; शरद पवार यांचा गंभीर इशारा

मुंबई नगरी टीम

दिल्ली । २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल असा विश्वास व्यक्त करतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांना दुर करून विरोधकांच्या विरोधात ज्याप्रकारची पावले उचलली गेली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.आज दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांच्या गटाला साथ देणारे खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांना निलंबित करण्याचा ठराव करण्यात आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत केंद्रीय कार्यकारणीची बैठक आज दिल्लीत पार पडली.या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.ज्या लोकांनी जनतेला वचन देवून त्यांचे मतदान घेऊन चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांना किंमत द्यावीच लागेल असा सज्जड इशारा देत,राजकीय स्थिती बदलेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या हातात महाराष्ट्रातील जनता सत्ता देईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.पक्षाला संपवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला.आता पक्षाला मजबूतीने उभे करणे आणि चांगल्या स्थितीत आणणे ही मानसिकता आमच्या सर्व लोकांची होती.आजची बैठक आमची उमेद वाढवायला महत्त्वाची आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.कुणी काय म्हटले हे मला माहीत नाही.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. दुस-या कुणी प्रतिक्रिया दिली त्यात कोणतेही तथ्य नाही असा टोलाही शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.आजची कार्यकारिणीची बैठक संविधानाला धरून होती.त्यामुळे कुणी काही म्हटले असेल तर त्यात कोणतीही खरी गोष्ट नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आला आहे त्यात विधीमंडळ सदस्यांची संख्या हा महत्वाचा मुद्दा नाही. मात्र कुणाला पंतप्रधान बनायचे तर कुणाला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडाची खिल्ली उडवली.आमचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते निवडणूक आयोगाला सांगणार आहे. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर दुसऱ्या यंत्रणेकडे जाण्याचा विचार करु मात्र ही वेळ आमच्यावर येईल असे मला वाटत नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असेही शरद पवार म्हणाले.जिथे लोकांचे समर्थन आहे तिथे काय स्थिती असते हे मी पाहिले आहे आणि ज्याप्रकारे महाराष्ट्रात युवकांचे समर्थन मिळत आहे ते पहाता मला त्याचा आनंद आहे असेही शरद पवार म्हणाले. केंद्रातील भाजपचे सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर जागोजागी करत आहे.निवडणुकीला अजून अकरा महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर देशातील स्थिती बदलेल त्यावेळी त्यामध्ये काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ही आमची प्राथमिकता असेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleअधिकाऱ्यांनो बदलीच्या ठिकाणी लवकर हजर व्हा, अन्यथा होणार कडक कारवाई
Next articleसरकार पडणार या केवळ अफवा; शिवसेनेतील आमदार नाराज नाहीत