शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार,पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार

मुंबई नगरी टीम

नाशिक । हमी भावाचा कायदा करावा या मागणीसाठी शेतकरी दिलीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत मात्र मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही.मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही,त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार तसेच पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी यांनी संबोधित केले.या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.देशात आज शेतकरी समस्या,बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो,शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे,काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल.आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल.शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेतक-यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल असे राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की,आज द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोपही त्यांनी केला.भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त मन की बातच करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे.भाजपाच्या राज्यात गद्दार आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Previous articleमराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी २० तारखेला विशेष अधिवेशन
Next articleधनंजय मुंडेंमुळे बीडमधून भरघोस मतांनी विजयी होणार