मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात १५ हजार पोलीस भरती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे.या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.या भरतीमध्ये १० हजार ९०८ पोलीस शिपाई,२३४ पोलीस शिपाई चालक,२५ बॅण्डस् मॅन, २ हजार ३९३ सशस्त्री पोलीस शिपाई,५५४ कारागृह शिपाई व कारागृह शिपाई ही पदे क गट संवर्गातील आहेत.पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर ( तत्काळ मुल्याकंन होणारी ) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची असल्याने पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो.पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी,तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली होती.