आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही
गिरिश महाजन यांचे स्पष्टीकरण
मुंबई दि.२८ चाळीसगावतील वरखेडेच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन धावल्याचे वृत्त पसरताच त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. ‘मी स्वतः शाकाहारी असून, आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही. असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना रस्त्यात अचानक बिबट्या दिसल्याचा आरडा ओरडा सुरू झाला असता लोकांची आणि प्राण्यांची धावपळ सुरू झाली. त्यामुळे मी इतर अधिकाऱ्यांसह गाडीतून उतरलो. लोकांची सुरक्षा हा माझा उद्देश होता म्हणूनच खाली उतरलो. त्यामागे बिबट्याची शिकार करणे हा हेतू नव्हता. कुठलीही स्टंटबाजी मी केली नाही, असं स्पष्टीकरण महाजन यांनी दिले आहे. येथिल परिस्थिती पाहूनही गाडीत बसून राहीलो असतो तर मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत, अशी टीका झाली असती, लपून राहणे हा माझा स्वभाव नाहीच, म्हणून मी गाडीतून उतरून परिस्थितीला सामोरे गेलो, असेही महाजन यांनी सांगितले.