कोकणातील वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरीच्या
जमिनीची मोजणी सुरु करण्याचे निर्देश
मुंबई : कोकणातील वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरी हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून एक लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुक राज्यात होणार आहे. असा प्रकल्प राज्याच्या भाग्यात पुन्हा होणे नाही, त्यामुळे स्थानिकांना या प्रकल्पाचे महत्व समजवून सांगुन त्यांना द्यावयाच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढे काम सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे फायदे कंपनीने समजवून सांगावे,यासाठी याप्रकल्पाची माहिती सांगणारे सादरीकरण, फिल्म आणि इतर माध्यमातून प्रबोधन करावे. या प्रकल्पासाठी आपली जमीन देणा-या स्थनिकांना द्यावयाच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून जमिनीची मोजणीस सुरुवात करावी असे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. हा मोबदला जास्तीत जास्त असावा असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आदर्श असे मॉडेल तयार करावे, सर्वोत्तम सुविधांसह शाळा, दवाखाना यांचा समावेश असलेली वसाहत तयार करावी, झाडे, फळबागा, जमीन यासारख्या प्रत्येक बाबींचे योग्य मूल्यमापन करुन जास्तीत जास्त मोबदला द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रकल्प आपल्या फायद्याचा आहे याबाबत स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यांचे समाधान व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे मुखमंत्र्यांनी सांगितले.प्रकल्प उभारताना कोणतीही कटूता शिल्लक राहू नये यासाठी सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.