राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा अहवाल तयार नसताना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का?

राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा अहवाल तयार नसताना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का?

घटनास्थळी जाण्यास मनाई केली हे विरोधी पक्षनेत्यांचे वक्तव्य चुकीचे पंकजा मुंडे

परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हत तर घटनेचा कोणताही अहवाल आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे. वैद्यनाथ कारखान्यातील घटनास्थळावर जाण्यास आपणास मनाई करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना हादरून टाकणारी होती. गेली अनेक वर्षे हा कारखाना व्यवस्थित चालू होता, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले तरीही सर्व मोट बांधून प्रभावी यंत्रणा राबवली व गाळप यशस्वीपणे सुरू केले. दुष्काळ व ऊसाच्या उपलब्धता यामुळे चिंता असायची परंतु यावर्षीच्या पावसाने ऊस छान झाला ,शिस्त व प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही या हंगामात गाळपाचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. कर्मचाऱ्यांचा पगारही ३ डिसेंबर रोजीच देण्यात आला होता. शिवाय दुष्काळ आणि कारखाना बंदमुळे थकीत पगारही जानेवारीच्या अगोदर करण्याचे आम्ही जाहीर केले होते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. दोन वर्षाच्या संघर्षानंतर कारखान्याची परिस्थिती पुर्ववत चागली झाली असताना नेमके मुंडे यांच्या जयंतीच्या अगोदर झालेली दुर्घटना हादरून टाकणारी व विचारात पाडणारी आहे असे त्या म्हणाल्या.

या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणं, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणे हे प्रथम कर्तव्य असते, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला. जखमी कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर्स व लातूरला हलविण्यासाठी अॅम्ब्यूलन्स यासाठी संचालक व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आर्थिक व्यवस्थेबरोबर त्यांना मानसिक आधार देण्याचं काम आम्ही केलं असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचा घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वतःच्या शाबासकीच्या बातम्या स्वतःच देणे आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे त्यांनी केलेले वक्तव्य राजकारणाने बरबटलेले होते असे त्या म्हणाल्या.

रोखण्यात आल्याचे वक्तव्य चुकीचे

वैद्यनाथ ची दुर्घटना हा अपघात आहे की आणखी काय? हे अहवाल आल्यावरच कळेल. कारखान्याची टीम सुद्धा याचा तपास करीत आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणी साठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणे आवश्यक असते, मी स्वतः ,आमचे संचालक मंडळ व कार्यकर्ते जखमींच्या उपचारा मध्ये व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी व कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढत असल्याचे आढळले. तपासणीला यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने घटनास्थळावर तपासणी अधिकारी व संबंधित वगळता कोणीही जाऊ नये हा योग्य निर्णय घेऊन आम्ही पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते, त्यावर पोलिसांनी कारवाई करणे योग्यच होते. या निवेदनात कोणत्याही व्यक्तीचे नाव अधोरेखित केले नव्हते, त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे, रोखण्या-या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Previous articleपोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खा. सुप्रिया सुळे जखमी
Next articleराहुल गांधींच्या निवडीने लाखो कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here