मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई : शेतक-यांना जाहीर केलेली कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, भीमा कोरेगाव प्रकरण आदी मुद्दे हाताळण्यात सरकारला आलेले अपयश या कारणास्तव विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
उद्या पासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण , अजित पवार, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, सपाचे आ. अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.
कमला मील आग प्रकरण, भीमा कोरेगाव घटना, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराजांचे स्मारक, फसलेली कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, आदी प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचे कारण देत विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार आहे.