पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!

पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!

 विखे पाटील

मुंबई  : पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला.

 पोषण आहारासंदर्भात लक्षवेधीवर चर्चा होत असताना विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबीत असलेला पोषण आहाराचा निधी कधी देणार, अशी विचारणा महिला व बालकल्याण मंत्र्यांना केली. अंगणवाडी सेविका पदरचा पैसा खर्च करून ही योजना राबवत आहेत. परंतु, निधीची तरतूद करूनसुद्धा सरकार पोषण आहाराचे पैसे उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना आम्ही सरकारकडे पुरवणी मागणी केली आहे. परंतु, अद्याप निधी न मिळाल्याचे मंत्र्यांनी सभागृहात सांगितले. या उत्तरावर विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. पोषण आहाराचा निधी हा नियमित योजनेचा भाग असून, त्याला पुरवणी मागणीची गरजच काय? कुपोषण निर्मूलन हा प्राधान्याचा मुद्दा असताना पोषण आहारासाठी पैसा का उपलब्ध होत नाही? अशी प्रश्नांची झड त्यांनी यावेळी लावली. कुपोषण व बालमृत्युंमुळे महाराष्ट्राची प्रतीमा मलीन होत असतानाही सरकार यासंदर्भात संवेदनशील नसल्याचे सांगून विखे पाटील यांनी विरोधी पक्ष विधानसभेतून सभात्याग करीत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे समृद्धी महामार्ग, मेट्रोसाठी पैसे आहेत. पोषण आहारासाठी का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. कुपोषणासारख्या गंभीर मुद्यावरही राज्याच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नसतो, ही गंभीर बाब असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Previous articleगुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करणार
Next articleमंत्रीपद सोडेन पण नाणार प्रकरणी जनतेच्या पाठीशी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here