पृथ्वीराज देशमुख यांची माघार : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
नागपूर : विधानपरिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला निवडणूक होणार होती. ११ जागांसाठी भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी १२ वा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीची रंगत वाढली होती. मात्र आज भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, भाजपाचे विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर,रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अॅड. अनिल परब , मनिषा कायंदे , शेकापचे जयंत पाटील,काॅग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.