मुंबई नगरी टीम
नागपूर: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही बोलू नये म्हणून मुख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले,असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.परिवर्तन यात्रेसाठी नागपूरला रवाना होण्यापूर्वी त्यांनी ही टीका केली.
अण्णा हजारे यांनी सात दिवसांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.त्यावर पाटील म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मिळून नऊ महिन्यांचा कालावधी आहे.नऊ महिने अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात बोलू नये,म्हणून मुख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.राळेगणसिद्धी येथे सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अण्णा हजारे यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सात तास मॅरॅथॉन चर्चा केली.त्यानंतर अण्णांनी आपल्या बहुतेक मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली होती.अण्णांच्या उपोषणाला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला होता.